परीक्षा शुल्कात भरमसाठ वाढ; एक हजारावर पोहोचले शुल्क
चंद्रपूर:- तलाठी, वनविभागासह विविध विभागांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया पार पडल्या. परंतु त्यासाठीच्या परीक्षा शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली असून, भरती प्रक्रियेत शासन मालामाल तर बेरोजगार उमेदवार मात्र कंगाल असे चित्र दिसून येत आहे. राज्यात मोठ्या अवधीनंतर राज्य सरकारकडून विविध विभागांतील रिक्त पदांसाठी जागा भरण्यात येत होत्या.
यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. लेखी परीक्षा घेण्याचे कंत्राट राज्य शासनाने कंपन्यांना दिले आहे. परंतु या कंपन्यांनी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क निश्चित केले आहे. आधीच रोजगार नसलेल्या बेरोजगारांना यामुळे मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. यामुळेच परीक्षा शुल्क कमी करण्याची मागणी राज्यभरातील सुशिक्षित बेरोजगारांकडून करण्यात येत आहे. आतातरी सरकार जागे होऊन परीक्षा शुल्क कमी करणार का? याकडे सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.