चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुढे सरसावले ना. सुधीर मुनगंटीवार #chandrapur #Sudhirmungantiwar

Bhairav Diwase
0
मुंबई:- खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली असून शेतकरी वेगाने कामाला लागला आहे, बळीराजाला शासकीय योजनांचा योग्य व तात्काळ लाभ मिळावा यासाठी मी प्रयत्नशील असून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आज कृषिमंत्री श्री धनंजय मुंडे यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली, व त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.


चंद्रपूर जिल्ह्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजना तसेच नमो किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी मनुष्यबळ वाढावे तसेच पीक विमा योजनेची उर्वरित 51.31 कोटी रुपयांची अप्राप्त रक्कम तातडीने मिळावी या मागण्यांसाठी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषिमंत्री श्री. धनंजय मुंडे यांची भेट घेतली व निवेदन दिले.


या चर्चेदरम्यान ना. सुधीर मुनगंटीवार कृषिमंत्र्यांना म्हणाले की, खरीप हंगाम 2023 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तीन लाख 50 हजार 969 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा काढला होता. खरीप हंगाम सन 2023 24 मध्ये सोयाबीन वरील "येलो मोझॅक व बुरशीजन्य रोगामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. तसेच अवकाळी पावसामुळे कापसाचे नुकसान होऊन उत्पादन घटले होते, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पावले उचलणे भाग आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात ना. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे कि, पिक विमा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 91.62 कोटी रुपये प्राप्त होणे अपेक्षित होते. त्यापैकी केवळ 40.31 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले असून उर्वरित 51.31 कोटी रुपये पीक विम्याची रक्कम पिक विमा कंपन्यांकडून प्राप्त झालेली नाही. सद्यस्थितीत खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांची पेरणी सुरू झाली असून मागील पीक विमा रकमेची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे, सदर उर्वरित पीक विम्याचे रक्कम तातडीने जमा होण्यासंदर्भात पीक विमा कंपन्यांना निर्देशित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.



यासोबतच दिलेल्या दुसऱ्या निवेदनात ना. मुनगंटीवार यांनी पीक विमा योजनेच्या थकीत रकमेची शेतकऱ्यांसाठी मागणी केली. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्र शासनामार्फत पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अनुदान म्हणून जमा केला जातो. तसेच महाराष्ट्र शासनामार्फत नमो किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अनुदान देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सदर निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची कारवाई कृषी विभागामार्फत सुरू असून, यामध्ये शेतकऱ्यांचे ई-केवायसी करणे, आधार प्रमाणे भूत करणे जमीन नोंदणी करणे इत्यादी कामे अंतर्भूत आहेत ; परंतु कृषी विभागामध्ये कमी मनुष्यबळ असल्यामुळे ही कामे तातडीने पूर्ण होण्यास त्रास होत आहे. पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून कृषी विभागाने यासंदर्भात योग्य कार्यवाही करणे अपेक्षित आहे. सदर कामे करण्यास संगणक ऑपरेटर मदत घेणे अपेक्षित असून त्या मार्फत ही कामे करण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषिमंत्री श्री धनंजय मुंडे यांना केली. या चर्चेला कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि योग्य पावले उचलण्याची ग्वाही दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)