मुंबई:- ऐन पावसाळ्यात राज्य सरकारकडून पोलीस भरतीचा घाट घालण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात विविध 17 हजार रिक्त पदासांठी भरती होणार असून यासाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज करण्यात आले आहेत.
मात्र पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीच्या ठिकाणी पावसामुळे चिखल जमा झाल्यामुळे उमेदवारांची चाचणी घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. याशिवाय भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या राहण्याची सोयही राज्य सरकारकडून योग्य प्रकारे करण्यात आलेली नाही. याचपार्श्वूमीवर गुरुवारी (27 जून) सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस भरतीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस भरतीवरून सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांनी म्हटले की, राज्यात सुरू असलेल्या पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना सोयी सुविधा दिल्या जातील, अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र कोणतीही व्यवस्था भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची करण्यात आली नाही. उमेदवारांना रस्त्यावर, पुलाखाली आडोसा घ्यावा लागत आहे. त्यामुळे या भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची व्यवस्था करण्याची सूचना द्यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. अंबादास दानवेंच्या मागणीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंबादास यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व युनिट्सला आपण सूचना दिल्या आहेत. सर्व ठिकाणी मंगल कार्यालय घेऊन त्याठिकाणी पोलीस भरती करण्यासाठी आलेल्या उमेदवारांची सोय करण्यात आलेली आहे. तसेच ज्याठिकाणी सोय नसेल तिथे पुन्हा नव्याने सांगून व्यवस्था करण्यात येईल. तरीही विरोधी पक्षनेत्यांनी जी काही ठिकाणं निदर्शनास आणून दिली आहेत आणि काही महत्त्वाची ठिकाणं असतील ती सुद्धा त्यांच्याकडून आम्ही घेऊ आणि युनिट्सला त्याबद्दल माहिती देऊ, असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले.