मुंबई:- ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीची मैदानी (Police Bharti 2024) चाचणी पूर्ण केली आहे. अशा उमेदवारांची पोलीस शिपाई लेखी परीक्षा दि. 7 जुलै रोजी व चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा येत्या दि. 14 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. याबाबत अपर पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक घेण्यात आली असून त्याप्रमाणे तयारी करण्याच्या सूचना अपर पोलीस महासंचालक यांनी पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तब्बल चार महिने पोलिस भरती प्रक्रिया रखडली होती. या भरतीला आता वेग येताना दिसत आहे. मैदानी चाचणी संपल्याबरोबर लेखी परीक्षा घेण्याची तयारी गृह विभागाने दाखवली आहे. लेखी परीक्षेच्या दृष्टीकोनातून पुर्व तयारी, सुचना व निर्देश देण्याकरता अपर पोलीस महासंचालक यांच्याकडून बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बैठकीत लेखी परीक्षेच्या संदर्भातील मुद्दे समोर ठेवण्यात आले. मैदानी चाचणी संपली की लगेच काही दिवसांत लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
कोणत्या पदासाठी किती अर्ज दाखल
दरम्यान राज्यातील पोलिस भरतीसाठी 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. बँड्समन पदासाठी 41 जागा उपलब्ध असून त्यासाठी 32 हजार 26 जणांनी अर्ज केले आहेत. तुरूंग विभागातील शिपाई या पदासाठी 1800 जागा उपलब्ध असून यासाठी 3 लाख 72 हजार 354 अर्ज आले आहेत. चालक पदासाठी 1686 जागा उपलब्ध असून 1 लाख 98 हजार 300 अर्ज आले आहेत. सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक अर्ज पोलीस शिपाई पदासाठी आहेत. 9 हजार 595 जागांसाठी 8 लाख 22 हजार 984 अर्ज आले आहेत.
पोलीस भरतीच्या उमेदवारांकडून मैदानी व लेखी परीक्षेसाठी जोमाने तयारी सुरू आहे. मैदानी चाचणी 50 गुणांची तर लेखी परीक्षा 100 गुणांची असणार आहे. प्रत्येक एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. लेखी परीक्षेला बसण्यासाठी मैदानी चाचणीत किमान 40 टक्के गुण मिळवणे (Police Bharti 2024) उमेदवाराला बंधनकारक असणार आहे. पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याने ग्रामीण भागातील तरूणांना याचा मोठा फायदा होणार आहे; पण लेखी परीक्षेसाठी त्यांना चांगलेच कष्ट घ्यावे लागणार आहेत.
लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांसाठी सूचना
सर्व उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी वेळेत परीक्षा केंद्रांवर हजर राहणे बंधनकारक असेल.
उमेदवारांनी परीक्षेला येताना शासकीय ओळखपत्र, 'महाआयटी'कडून यापूर्वी दिलेले प्रवेशपत्र व शारीरिक चाचणीवेळी दिलेले पोलिस भरतीचे ओळखपत्र घेऊन यावे.
उमेदवारांना पॅड, काळ्या शाईचे पेन कार्यालयाकडून पुरविले जाणार असल्याने कागदपत्रांशिवाय उमेदवारांनी कोणतेही साहित्य घेऊन येवू नये.
उमेदवारांनी मोबाईल, स्मार्ट वॉच, गणकयंत्र, ब्ल्युट्यूथ जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे. कोणी नियम डावलल्यास त्याच्यावर कारवाई होईल आणि भरतीतून तत्काळ बाद केले जाईल.