चिखली:- चंद्रपूर येथून बुलढाण्याकडे लग्नाचे वर्हाड घेऊन निघालेल्या खाजगी बसने अचानक पेट घेतला. यात संपूर्ण बस जळून खाक झाली. ही घटना स्थानिक मेहकर फाटा येथे मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. वर्हाडींना चहा घेण्यासाठी बस थांबली असता हा थरार घडला.
Also Read:- अमरावतीच्या 2 युवकांचा चंद्रपूरात मृत्यू
बुलढाणा येथील तुषार कृष्णराव राठोड यांचे लग्न आटोपून 48 वर्हाडी चंद्रपूर येथून खाजगी बसमधून बुलढाण्याकडे परत येत होते. रात्रभर प्रवास केल्यानंतर पहाटे 4 वाजताच्या सुमारास बस चिखलीच्या मेहकर फाटा येथे पोहोचली. या ठिकाणी चहापाणी घेण्यासाठी चालकाने बस थांबवली. त्यामुळे बहुतांश प्रवासी बसमधून उतरले तर काही बसमध्येच झोपले होते
Also Read:- 18व्या लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला
याच दरम्यान शॉर्टसर्किट झाल्याने बसने पेट घेतला. प्रसंगावधान राखत बसमधून उतरलेल्या प्रवाशांनी बसमध्ये झोपलेल्या सर्वांना खाली उतरविले. त्यामुळे कुणालाही इजा झाली नाही. त्यानंतर अवघ्या काही वेळातच बसला आगीने वेढले आणि पाहता पाहता बसचा कोळसा झाला.
घटनास्थळी तातडीने अग्निशामक वाहन पोहोचले, मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. ही बस बुलढाणा येथील उत्तम पवार यांच्या मालकीची असल्याचे समजते. घटनेत वर्हाड्यांसह चालक, वाहक सुखरूप बचावले असले तरी बससह वर्हाड्यांचे सामान पूर्णपणे जळून खाक झाले.