यवतमाळ:- यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी पासून जवळच असलेल्या सावळेश्वर येथील पैनगंगा नदीवर दोन मुली धुणे धुण्यासाठी गेल्या. पण धुणे धूत असताना अचानक तोल जाऊन त्या पाण्यात बुडाल्या. या मुलींना वाचवण्यासाठी तिथे जवळच असलेल्या दोन मुलांनी पाण्यात उडी घेतली.
Also Read:- प्रेमविवाहाचा रक्तरंजित अंत
पण या मुलींचा आणि वाचविण्याऱ्या एका मुलाचा अशा तिघांचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे सावळेश्वर गावावर एकच शोककळा पसरली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने दोन मुलींसह त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एका मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सावळेश्वर येथे पैनगंगा नदीपात्रात घडली. कावेरी गौतम मुनेश्वर (१५), अवंतिका राहुल पाटील (१४), चेतन देवानंद काळबांडे (१६) या तिघांचा मृत्यू झाला.
सावळेश्वर येथे मामाच्या घरी आलेली कावेरी आणि तिची मैत्रीण अवंतिका या दोघी गावाजवळून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. धुणे आटोपल्यानंतर या दोघीही अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघी खोल पाण्यात बुडू लागल्या. त्यांनी मदतीसाठी धावा सुरू केला. त्यांची आरडाओरडा ऐकू आल्याने याच ठिकाणी असलेले चेतन देवानंद काळबांडे आणि शुभम सिद्धार्थ काळबांडे हे दोघे मदतीसाठी धावले.
Also Read:- सुरजागडच्या हायवाने घेतला मजुराचा बळी
तिघांचा मृत्यू, गावकरी हळहळले
या दोघांनीही नदीपात्रात उडी घेतली. घाबरलेल्या कावेरी आणि अवंतिकाने वाचवण्यासाठी आलेल्या चेतनला घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. शुभमला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. चौघांनाही नदीतून बाहेर काढून ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. डॉक्टरांनी कावेरी, अवंतिका आणि चेतन यांना मृत घोषित केले. शुभम याच्यावर प्रथमोपचार करून उपचारासाठी यवतमाळ येथे हलविले आहे.